मुंबई : बेस्ट उपक्रमातील १०६ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला असून कर्तव्यावर असताना आतापर्यंत ९० कर्मचारी दगावले असून यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. परंतु १५ कर्मचाऱ्यांचे वारस अद्याप अनुकंपातत्त्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

करोनाच्या सुरुवातीच्या काळापासून मुंबई व महानगरात बेस्ट उपक्रमातील गाड्या या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहिले. कर्तव्य बजावताना काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत कर्तव्यावर असताना ३ हजार ३७५ कर्मचारी करोनाबाधित झाले. त्यातील ३ हजार २२७ बरे झाले तर ३९ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९० कर्मचारी करोनामुळे दगावले असून सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे, तर ६४ जणांच्या वारसांना बेस्टमध्ये अनुकंपातत्त्वावर नोकरीही दिल्याचे सांगितले. कर्तव्यावर नसताना १२३ कर्मचारी करोनाबाधित झाले. यातून ८६ जण बरे झाले आहे. एका कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय १६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्यावर नसताना कर्मचारी दगावल्याने त्यांच्या वारसांना मात्र आर्थिक मदत किं वा अनुकम्पा तत्त्वावरील नोकरी मिळालेली नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

करोना नियंत्रणासह टीबी, एचआयव्ही, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यांवर बेस्टमध्ये नियंत्रण मिळवण्यात आल्याने त्यांच्या कामगिरीची जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य संस्थांनीही दखल घेतली आहे. संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक कामगार संघटना (आयएलओ) जिनिव्हाने ‘कामाच्या ठिकाणी शून्य भेदभाव’ साधण्याकरिता एका आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी बेस्टमधील आरोग्य सेवेवर लघुचित्र दाखवण्यात आले.