‘बेस्ट’ च्या कामगारांकडून सातवा वेतन आयोग लागू करणयाच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून केले जात असलेले बेमुदत उपोषण गुरूवारी अखेर काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. मात्र, गौरी-गणपतीनंतर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी हे उपोषण मागे घेण्यासाठी केलेल्या आव्हानाला कामगारांकडून प्रतिसाद देण्यात आला आहे.

बेस्ट कामगारांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. तर, कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळाताच खासदार नारायण राणे यांनी उपोषणस्थळी जाऊन कामगारांची चौकशी करत सणवारांच्या दिवसात उपोशषण करणं योग्य ठरणार नाही, यामुळे सामान्य जनतेचे हाल होतील. तुम्ही हव तर तुमच्या मागण्यांसाठी गौरी-गणपतीनंतर पुन्हा उपोषण सुरू करा, तेव्हा तुमच्या बरोबर मी देखील असेल असे आश्वासन दिले. राणेंकडून करण्यात आलेल्या विनंतीचा मान ठेवत कामगारांनी उपोषण तूर्तास स्थगित केलं आहे. यावेळी राणेंनी शिवसेनेवर टीकास्र सोडत, शिवसेनेनेच बेस्ट डबघाईला आणलं असल्याचा आरोप केला.