विजयकुमार कृषी खात्याच्या प्रधान सचिवपदी वादग्रस्त ठरलेले कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागात (चौकशी व सुनावणी) दुय्यम पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी खात्याच्या प्रधान सचिवपदी विजयकुमार यांना नेमण्यात आले आहे. कृषी खात्यातील सहसचिव राजेंद्र घाडगे यांना सहाय यांनी घरी जाण्याची परवानगी दिली नाही व त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने सहाय यांच्याविरोधात तीव्र असंतोष उफाळून आला. त्यातच मुलाच्या अंतिम संस्कारासाठी गेले असताना रजेच्या अर्ज कोठे आहे, असा शेरा त्यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या रजेच्या टिप्पणीवर सहाय यांनी मारल्याने त्यात भर पडली. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले व सहाय यांना राज्याबाहेर पाठवावे, अशी मागणीही केली. अखेर त्यांची कृषी खात्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. सहाय यांच्याबरोबरच आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. शाम लाल गोयल यांची महसूल व वन विभागात प्रधान सचिव व विशेष कार्य अधिकारी (अपील) या पदी तर चंद्रशेखर ओक यांची राज्य निवडणूक आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. सहाय यांच्या कृतीवर राज्यातील अनेक मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे सहाय यांचे निलंबन करण्यात यावे अशीही मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच सहाय यांची उचलबांगडी होणार हे निश्चित होते. अखेर त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले.