मुंबईत प्रथमच स्वदेशी लशीच्या चाचण्या; प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी

मुंबई : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी निर्मितीच्या करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात करण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव रुग्णालयाच्या एथिक्स समितीकडे पाठविला असून मंजुरी मिळाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. मुंबईत या लशीच्या चाचण्या प्रथमच होत आहेत.

भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वदेशी निर्मित केलेल्या कोव्हॅक्सीन या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे. देशभरात दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना

यांसह १० राज्यांत २१ ठिकाणी २८ हजार ५०० जणांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबईत या चाचण्या करण्यासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे.

एथिस्क समितीकडे प्रस्ताव सादर केला असून या आठवडय़ात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होईल. लस टोचण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागेल. सुरुवातीला ५०० ते एक हजार स्वयंसेवकांवर चाचण्या करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

मुंबईत सध्या ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविशील्ड’ या लशीच्या चाचण्या मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू आहेत. या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लशीसाठीचे निकष

१८ ते ६० वर्षांमधील ज्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झालेली नाही. इम्युनोसप्रेस औषधे घेत नाहीत आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे अन्य कोणतेही दीर्घ आजार नाहीत.

ही लस दोन टप्प्यांत दिली जाणार असून पहिला डोस दिल्यावर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. लस टोचण्याच्या प्रक्रियेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल.

– डॉ. मोहन जोशी,अधिष्ठाता, लोकमान्य टिळक रुग्णालय