तारापूरजवळ एमआयडीसीमध्ये नोव्हाफिन रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर तीन जण ठार झाल्याची माहितीही समोर येते आहे. ठार झालेल्या तिघांपैकी एकजण  सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचे नाव समजू शकलेले नाही.  या स्फोटाचे हादरे तब्बल १५ किमीचा परिसरात बसल्याचीही माहिती समोर येते आहे. सुमारे एक ते दीड तास स्फोटाचे आवाज ऐकू येत होते अशीही माहिती काही स्थानिकांनी दिली.

अचानक झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की शेजारच्या आरती व भारत रसायन यांसह एकूण सहा कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या. अग्निशामक दलाच्या ८ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. रात्री ११ ते ११.१५ च्या सुमारास ही घटना घडली.

बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की या कंपनीपासून तीन किमी अंतरापर्यंत असलेल्या इमारतींच्या घरांच्या काही काचा फुटल्या.

नोव्हाफिन कंपनीत झालेल्या स्फोटामुळे इतर कंपन्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर तीन रूग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत अशी माहिती समोर आली आहे. पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणी अनेक गावांमध्येही हादरे जाणवले. काही गावांमध्ये भूकंप झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि एका जागी जमा झाले. मात्र भूकंप नसल्याचे स्पष्ट झाल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

स्फोटानंतर तारापूर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. तसेच लाईट गेल्याने अंधारही झाला होता. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत आरती ड्रग्ज, प्राची फार्मासिटीकल्स, भारत आणि युनिमॅक्स या कंपन्यांमध्येही आग पसरली. या कंपन्यांच्या कामगारांनाही दुखापत झाली असून या सगळ्यांवर तीन रूग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.