मुंबईत बुधवारी २,६५४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यातील एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. मात्र आशादायक गोष्ट ही आहे की त्यापैकी २,०६६ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर कमी होत आला तरी मुंबईत दररोज दोन हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. बुधवारी २६५४ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या २,०५,१४२ वर गेली आहे. तर एका दिवसात २,०६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आतापर्यंत १,६९,२६८ रुग्ण म्हणजेच ८२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २६,५४० रुग्ण उपचाराधीन आहेत. ४६ मृत रुग्णांपैकी ३८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात २९ पुरुष तर १७ रुग्ण महिला होत्या. ३२ रुग्ण हे ६० वर्षांंवरील होते.

मुंबईत आतापर्यंत ११ लाख १५ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या.