सुशांत सिंह मृत्यू प्रकऱणी आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना अद्यापही होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याने बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केल्याने विनय तिवारी तपासासाठी बिहारमधून मुंबईत दाखल झाले होते. पण मुंबईत पोहोतचात त्यांनी क्वारंटाइन करण्यात आलं.

“आयपीएस विनय तिवारी यांना अद्यापही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे,” असं डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.

“बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय अव्यवहार्य आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याप्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुप्तेश्वर पांडे यांनी जबरदस्तीने क्वारंटाइन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. बुधवारी महाराष्ट्र पोलिसांना विनय तिवारी यांनी क्वारंटाइनमधून शिथीलता देण्याची विनंती आपण केली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“आम्ही अजून एक दिवस वाट पाहू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांविरोधात कारवाई करु. आम्ही यासंबंधी बिहार सरकारकडून सल्ला घेत असून न्यायालयात जाण्याचा मार्गही निवडू शकतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.

बिहार पोलीस मुंबई सोडून पाटण्याला रवाना
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर बिहार पोलीस मुंबई सोडून रवाना झाले आहेत. चार पोलीस अधिकारी आज मुंबईतून बिहारसाठी रवाना झाले. मात्र यावेळी पोलिस अधीक्षक विनय तिवारी मुंबईतच क्वारंटाइन राहणार आहेत.