उष्माघातामुळे मूच्र्छा येऊन जमिनीवर पडल्याने पक्षी जखमी होण्याच्या घटना

मुंबईसह राज्यभरातील तापमानाने चाळिशी गाठल्याने सर्वसामान्यांना भरदुपारी घराबाहेर पडणेही जिकिरीचे होऊन बसले असताना आता प्राणी व पक्ष्यांवरही वाढत्या उष्म्याचा परिणाम दिसू लागला आहे. विशेषत: प्रखर उन्हामुळे हवेत उडता उडताच पक्ष्याला घेरी येऊन तो खाली पडून जखमी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत २३ कबूतरे, ८ घारी, ४ पोपट, १ श्वान यांना उष्माघाताचा फटका बसल्याची नोंद झाली आहे.

मार्च ते मे हे तीन महिने पक्ष्यांचा घरटी बांधण्याचा काळ असतो. पहिल्या दोन महिन्यांत पक्षी घरटे बांधण्यासाठी आवश्यक सामग्री शोधण्यासाठी वणवण हिंडत असतात. हे साहित्य जमवल्यानंतर मे महिन्यातील प्रखर उन्हापूर्वी ते आपला निवारा बांधतात; परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात पनवेल, ठाणे या भागात तापमानाने ४२ आकडा गाठला होता. त्यामुळे फिरणाऱ्या पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास झाला. आकाशात उडत असताना घेरी येऊन जमिनीवर कोसळल्याने पक्षी जखमी झाल्याच्या अनेक घटना गेल्या दोन आठवडय़ांत घडल्या.

मुंबईतील बाई साखराबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयात मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात २२ कबूतरे, ८ घारी, ४ पोपट, १ कोकिळ, १ पान कोबंडी या पक्ष्यांना उष्माघातावरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती रुग्णालयाचे सचिव डॉ. कर्नल जे. सी. खन्ना यांनी दिली. यातील बरेच पक्षी तब्येत चांगली झाल्यानंतर उडून गेले; परंतु तीन ते चार पक्ष्यांच्या पंखांना दुखापत झाल्याने त्यांना अद्याप उडता येत नाही, असे ते म्हणाले.

मंगळवारी डोंबिवली येथील एका भटक्या श्वानाला सतत घेरी येत असल्यामुळे त्याला मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उष्णतेचा त्रास झाल्यामुळे या श्वानाला सतत चक्कर येत होती. तो जोरजोरात श्वास घेत होता, त्यामुळे तेथील स्थानिकांनी ‘प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी’ (पॉझ) या संस्थेला याबद्दल माहिती दिली. उष्णतेमुळे प्राण्यांनाही त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्यात इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकोज पावडर टाकावी. घरातील बाल्कनीत किंवा घराबाहेर प्राण्यांना पिण्यासाठी मडके ठेवावे, असे आवाहन ‘पॉझ’ संस्थेचे नीलेश भणगे यांनी केले आहे.