प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मात्र अनभिज्ञ

मुंबईसह कोकणात ‘अटलबंधन’ मोहीम राबविली जाणार असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र ‘अटलबंधन’बाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मात्र कोणतीच कल्पना नाही.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईसह कोकणात ‘अटलबंधन’ ही मोहीम राबविली जाणार असून गणेशोत्सवात त्यावर भर दिला जाईल.

प्रसाद लाड यांनी कल्पना मांडली आणि आम्ही या मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात केल्याची माहिती अ‍ॅड. शेलार यांनी दिली.

केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांचाही भाजपशी स्नेह वाढावा, यासाठी ‘अटलबंधन’ योजना राबविली जाणार आहे. मात्र यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कल्पनाच नसल्याने राज्य पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तसेच, यामुळे या योजनेवरून सत्ताधारी भाजपमध्येच संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.