लस घेतलेल्या सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास परवानगीची मागणी
मुंबई : करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी दैनंदिन व्यवहार बंद करून ठेवणार का, असा सवाल करीत लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना सुरक्षा नियमांचे पालन करून लोकल प्रवासासह सर्व कामकाज करण्याची परवानगी देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. सरकारने परवानगी न दिल्यास दोन ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

जनजीवन बंद ठेवून चालणार नाही, परिस्थितीला सामोरे जावे लागेलच, असे सांगून पाटील म्हणाले, लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही मुखपट्टी वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे.

दरम्यान, मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील, असा इशारा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिला. मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत राज्य सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्राणवायूअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दिले असल्याने आघाडी सरकारचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे. केंद्र सरकार प्राणवायूचा पुरेसा पुरवठा करीत नसल्याचे आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारमधील काही मंत्री करीत होते. आता न्यायालयात दिलेल्या शपथपत्रामुळे या सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली दिल्याचेही उपाध्ये यांनी नमूद केले.