भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, तसंच शिवसेनेकडूनही आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. “निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणे देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “चंद्रकांतदादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले आहेत. तिथे त्यांनी यापुढे भाजपा म्हणून लढणार असून, स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, तसंच शिवसेनेकडूनही आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही हे मी स्पष्ट करु इच्छितो. आत्ता कोणतीही चर्चा आमच्यासमोर नाही”.

चंद्रकांत पाटील काय बोलले आहेत?
“राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे बुधवारी केले.

आमदार पाटील म्हणाले, “बिहारमध्ये नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली. पण पटत नसल्याने नितेश कुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते व भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात हिंदुत्वाचा असा काही पेच झाल्याने असा बदल व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटले तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील. पण निवडणूक मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्य़क्ष जे. पी. नड्डा म्हणाले त्याप्रमाणे स्वबळावर लढली जाईल. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत”.