लोकसभेपासून पंचायत समित्यांपर्यंत सर्वाधिक सदस्य निवडून येण्याबरोबरच सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. १९९०च्या दशकापर्यंत काँग्रेसच्या हाती अशा प्रकारे एकहाती सत्ता असायची, आता ही जागा भाजपने घेतली आहे.

राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी सर्वाधिक २३ जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या. तेव्हा भाजपने शिवसेनेबरोबर युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. विधानसभेत स्वबळावर भाजपचे सर्वाधिक १२२ आमदार निवडून आले होते.  कल्याण-डोंबिवलीमध्ये सत्ता मिळाली नसली तरी जागांच्या संख्येत वाढ झाली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले होते. गेल्या वर्षी झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक घेण्याचा निर्णय भाजपला फायदेशीर ठरला होता.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले.  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या राजकारणावर काँग्रेसचा पगडा होता.  १९८० नंतर शहरी भागांमध्ये शिवसेना किंवा भाजपचे वर्चस्व निर्माण झाले. पुढे महानगरपालिकांमध्ये शिवसेना वा भाजपला यश मिळत गेले तर नगरपालिकांमध्ये संमिश्र तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असायचे. शहरी भागात शिवसेना व भाजप तर ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस अशी राजकीय रचना निर्माण झाली होती. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर सहकार क्षेत्रावर किंवा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतांचे विभाजन झाले तरीही ग्रामीण भागांमध्ये भाजपला तेवढा जनाधार मिळाला नव्हता.

राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजपने राज्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा भाजपला फायदा झाल्याने यश मिळाले.