भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवी मुंबईतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी प्रसाद लाड यांच्यावर निरुपम आणि चव्हाण यांनी आरोप केले होते, त्याप्रकरणी लाड यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप मागे घ्यावे असं या नोटीशीत म्हटलं आहे.

यापूर्वी, काँग्रेसने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्यामुळे मी काँग्रेस विरोधात ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करतो आहे असे प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि बिल्डर्ससोबत मैत्री आहे असेही लाड यांनी म्हटले होते.

काय होता काँग्रेसचा आरोप –

नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यातील बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे खास दोस्त आहेत. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत. त्यामुळे लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.