सध्या महाराष्ट्रात आणीबाणी शब्दावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना, देशात घोषित आणीबाणी आहे का? असा खोचक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर आज सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून याच मुद्द्याला धरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. ‘ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय, त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही का? फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले’, असा टोला शिवसेनेने फडणवीसांना लगावला. या मुद्द्यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

‘लोकसत्ता.कॉम’च्या बातमीची लिंक शेअर करून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेने केलेल्या टीकेचा समाचार घेतला. “सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये”, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. “आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवाळाची चिंता करा”, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका केला.

आणखी वाचा- शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसं घडलं, शिवसेनेचा फडणवीसांना टोला

‘सामना’तून फडणवीसांवर टीका

देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरण समोर आणले नाही. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला, असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.