नवाब मलिक हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहीर आहेत. आमदारांना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले ही सरकारची नियोजन शून्यता आहे आणि कामकाज सल्लागार समिती ही आमदारांना तारांकित प्रश्नांपासून रोखण्यासाठी नव्हती, असं वक्तव्य भाजपाचे नेते राम कदम यांनी केलं आहे.

राज्य सरकार हे विकासविरोधी असून सरकारच्या कामाची पद्धत ही अजब आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. प्रश्नोत्तराचा तासही होणार नाही. सरकारनं आमदारांना प्रश्न दाखल करण्यापासून रोखलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला होता.

कामकाज सल्लागार समितीच्या अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला आपल्या पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते, असं ट्विट करत मलिक यांनी राम कदम यांना टोला हाणला होता.

आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न तीस दिवस आधी देणे अपेक्षित असते, सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात, असंही त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावर पुन्हा एकदा राम कदम यांनी ट्विट करत नबाव मलिक यांच्यावर निशाणा साधला.