हैदराबादमधील महानगरपालिकेची निवडणूक असली तरी ती निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. हैदराबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस. दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाली असली तर भाजपनं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, निकालानंतर भाजपा नेते राम कदम यांनी मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बिहारमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भाजपला हैदराबादमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं त्यावर देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय. लोकांनी विकासाला स्वीकारलं आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचाच भगवा फडकणार,” असं राम कदम म्हणाले.

“शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. करोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला तो लोकांच्या लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार,” असंही त्यांनी नमूद केलं.

… आणि त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह

देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेससोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांना मोठा अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. असं असलंतरी राज्यात ते त्यांच्यासोबतच सरकार चालवत आहेत हा विरोधाभास असल्याचंही कदम म्हणाले. बराक ओबामा यांनीदेखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेसचे नेते केव्हा पर्यंत एका कुटुंबाच्याच मागे धावत राहणार?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.