कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. उद्धव ठाकरे सरकारसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 'एमएमआरडीए'ला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलं. यासोबतच जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जात असतानाच भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली. 'उद्धव ठाकरे सरकारचं वैशिट्य काय? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे', असे ट्विट भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं. तसेच, 'सरकारने घेतलेल्या मनमानी निर्णयांची कोर्टाकडून फजिती होते', अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे सरकारची खिल्ली उडवली. @OfficeofUT सरकारच वैशिष्ठ्य काय? @Dev_Fadnavis सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना दे स्थगिती आणि @OfficeofUT सरकारने घेतलेल्या मनमानी निर्णयांची कोर्टाकडून होते फजिती — Keshav Upadhye (@keshavupadhye) December 17, 2020 याच मुद्द्यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी भाष्य केले. “ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लावली आहे ते अपेक्षितच होते. बाल रंगभूमीवर बालनाट्य सध्या बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात “होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!” नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत", अशा शब्दात आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली. तर, "विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? या कामात जेवढा उशीर होईल तितकं नुकसान होईल. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आता आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं,” असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.