भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकाबाजूला तर, भाजपा-मनसे एकाबाजूला असे चित्र आहे. भाजपा आणि मनसेमध्ये अधिकृत आघाडी नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय जवळीक मात्र वाढत चालली आहे.

राज ठाकरे यांच्या मनसेने आता हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार दोघे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात नेहमीच भेटीगाठी होत असतात. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेलार यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली ही दुसरी भेट आहे.