रिपब्लीक टिव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला. वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात निराशा पदरी पडल्यानंतर अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायदान करणारी घटनात्मक संस्था म्हणून आपण (न्यायालय) कायद्याची अंमलबजावणी केली नाही, नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले नाही तर कोण करणार, अशी परखड टिप्पणी सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान केली. अर्णब गोस्वामी यांची सुटका केल्यानंतर मुंबईच भाजपाचे आमदार राम कदम यांनी मंत्रालयाबाहेर पेढे वाढत आनंद साजरा केला. लोकशाहीचा विजय झाल्याची भावना व्यक्त करत राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये दिवाळी सुरु झाल्याचं म्हटलं आहे. आज लोकतंत्र के जीत #ArnabIsBackDiwaliStarts की खुशी में मंत्रालय के बाहर हाथो दीप जलाते हुए मिठाई सभी को खिलाकर #Diwali2020 मनाई #ArnabGoswamy #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia #DiwaliWithArnab pic.twitter.com/0C5xd7ix5p — Ram Kadam - राम कदम (@ramkadam) November 12, 2020 रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. न्या. चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सकाळी ११ ते दुपारी साडेचार अशी साडेपाच तास सलग सुनावणी घेतली. आपली लोकशाही अत्यंत सक्षम आहे. वृत्तवाहिन्यांवरून झालेल्या टिप्पणीकडे सरकारांनी दुर्लक्ष केले पाहिजे. या मुद्दय़ांवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. अशा टीका-टिपणीचा निवडणुकीवर खरेच काही फरक पडतो असे तुम्हाला (राज्य सरकार) वाटते का, असा प्रश्नही न्यायालयाने केला. रायगडमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गोस्वामी यांना अटक करण्यात आली. गोस्वामी व अन्य तीन आरोपींना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर हंगामी जामीन देण्यात आला. उच्च न्यायालयाने जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला होता. त्यावर, आरोपीला योग्य व निष्पक्षपणे न्याय मागण्याची संधी दिली गेली पाहिजे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.