राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदावर बसण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण मुलाचं कर्तव्य आणि बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेवरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “काय नाटक आहे? कसलं कर्तव्य आणि कसलं काय”, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत त्यांनी ही टीका केली आहे.

nilesh rane tweet about cm uddhav thackeray
निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका (फोटो सौजन्य ट्विटर)

“बाळासाहेबांचे विचारच गाडून टाकले!”

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेली भूमिका हे नाटक असल्याची टीका निलेश राणे यांनी या ट्वीटमध्ये केली आहे. “काय नाटक आहे. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे. कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी (बाळासाहेब ठाकरे) सांगितलं होतं की काँग्रेसला कायमचा गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

“बाळासाहेबांना त्या गुन्ह्याची किंमत नंतर भोगावी लागली”, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका!

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्र्यांनी बोलताना बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. “माझं कधीही स्वप्न नव्हतं. शेवटी एक पुत्रकर्तव्य असतं. मी माझ्या वडिलांना हातात हात घालून वचन दिलं होतं. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवणार. पण हे मी का म्हटलं त्यांना? कारण त्यांचा वारसा पेलण्याची जबाबदारी मी समर्थपणे घेतली आहे. नाही तर माझ्या आयुष्याचा उपयोग काय? मी घेतली ही जबाबदारी. त्यातून मी पुढे गेलो. माझ्यासाठी नाही काही केलं. मला मुख्यमंत्रिपदाची अजिबात अभिलाषा नव्हती”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.