भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मंगळवारी सांयकाळी अचानक मुंबई दौऱ्यावर आले. भाजपाध्यक्ष फक्त तीन तास मुंबईमध्ये होते. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र अमित शाह निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते त्यामुळे ही भेट तेव्हा झाली नव्हती. आता भाजपाध्यक्ष स्वत: मुंबईच्या दौऱ्यावर आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शाह यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर विलेपार्ले येथील बैठक बैठक संपवून अमित शाह रात्री आठ वाजता पुन्हा दिल्ली गाठली. या तीन तासांच्या बंद दारामध्ये झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. गेले अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असल्याने अमित शाह यांच्या या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या चर्चा झाल्याची राजकीय अंदाज बांधले जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होईल, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. मात्र हा मुहूर्त टळून गेला तरीही अद्याप मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत हालचाली दिसत नाहीत. राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात शिवसेनेला सोबत ठेवणंही भाजपासमोर आव्हान असेल.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाच्या विविध योजनांचा शुभारंभ मुंबईत करणार आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण देशाच्या विविध भागात करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ या संघाच्या कार्यालयात बैठक घेतली.