एलबीटी कर हा जीजीया कर सरकारने ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने आज केली. एलबीटी विरोधात व्यापा-यांच्या संघर्षाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे भाजपा मुंबईचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार आणि माजी आमदार राज पुरोहित यांनी संयुक्त निवेदनाद्वारे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या परिषदेत भाजपचे माजी प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते. राज्य सरकारने एलबीटी मागे घेण्याचा निर्णय १० दिवसात घेतला नाही तर भाजप आंदोलन करेल व प्रसंगी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आशिष शेलार यांनी दिला. जकात त्रासदायक असल्याने ती रद्द करण्याची व्यापा-यांची मागणी होती. पण त्याबदल्यात सरकारने लागू केलेला एलबीटी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती झाली. एलबीटीच्या जाचक तरतूदी आणि नोकरशाहीचा त्रास यामुळे व्यापारी हैराण झाले असून त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. गुजरातमध्ये जकात रद्द आणि एलबीटीसुद्धा लागू केलेला नाही. तरी तिथे महानगरपालिकांचा आणि नगरपालिकांचा कारभार चांगला चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने याबाबतीत गुजरात मॉडेल स्वीकारावे अशी सूचना आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.