सौरभ कुलश्रेष्ठ

बचतगटांच्या मदतीत ४० पट वाढ; काँग्रेसवर कुरघोडीचा प्रयत्न

निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्व आणि राम मंदिराचा जयघोष करणाऱ्या भाजपने मुस्लीम महिलांच्या मतपेढीवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील फडणवीस सरकारने मुस्लीम महिलांच्या बचतगटांना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या तुलनेत ४० पट अधिक कर्ज देत त्यांच्या अर्थकारणाला बळ दिले आहे. लाभार्थीकेंद्री निवडणूक प्रचारात या मुद्दय़ावर भर देण्यात येणार आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागण्याआधीच आपल्या मतपेढीचा आकार वाढवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने नियोजनबद्धरीत्या मुस्लीम महिलांच्या मतपेढीकडे लक्ष वळवले आहे. मुस्लीम महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या तिहेरी तलाक प्रथेला विरोध करत ती रद्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा मुस्लीम महिलांमध्ये भाजपबाबत सहानुभूती निर्माण करण्यास कारणीभूत ठरला होता. ती बाब हेरत महाराष्ट्रातील मुस्लीम महिलांची मतपेढी आपल्याकडे वळवण्याची रणनीती भाजपने आखली. फेब्रुवारीमध्ये मुस्लीम महिलांचा अभ्यासवर्ग, मार्चमध्ये मुस्लीमबहुल भागांत संवाद यात्रेचे आयोजन असे कार्यक्रम घेण्यात आले.

२००६ ते २०१४ या काळात राज्यात अल्पसंख्याक महिलांचे १४८० बचत गट राज्यात उभे राहिले. त्यांना राज्य सरकारने एक कोटी ४५ लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले. गरिबीचे प्रमाण अधिक असलेल्या मुस्लीम समाजातील महिलांसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळणे हा महत्त्वाचा विषय असल्याचे लक्षात घेऊन फडणवीस सरकारने या महिलांच्या बचत गटांना अधिक मदत करण्याचे धोरण स्वीकारले. गेल्या चार वर्षांत १९१२ बचत गटांना ५९.०५ टक्के कर्ज भाजप सरकारने दिले. फडणवीस सरकारने आता या माहितीचा तुलनात्मक लेखाजोखा तयार करत काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात मुस्लीम महिला बचत गटांना ४० पट जास्त मदत केल्याची माहिती मुस्लीम समाजातील मतदारांपर्यंत व त्यातही महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. मुस्लीम महिलांच्या नव्या मतपेढीचा हा फॉम्र्युला प्रचारात वापरण्यात येणार आहे.

विश्वास जिंकण्याचे प्रयत्न

महाराष्ट्राच्या लोकसंख्येत २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार मुस्लिमांचे प्रमाण ११.५४ टक्के आहे. राज्याची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून मुस्लिमांचे प्रमाण जवळपास सव्वा कोटी आहे. एकूण लोकसंख्येत महिलांचे प्रमाण सरासरी ५० टक्के गृहीत धरले जाते. त्या हिशेबाने राज्यात ६० लाख मुस्लीम महिला असाव्यात असा अंदाज आहे. मुस्लीम महिलाही स्वतंत्रपणे विचार करून मतदान करू शकतात, या विचारातून भाजपने एकापाठोपाठ एक कार्यक्रम राबवत त्यांना आपल्याबद्दल विश्वास वाटावा, असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न नेटाने सुरू ठेवले आहेत.