मुंबईत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गोवंडी शिवाजी नगर भागात केंद्रीय सशस्त्र दलाची तैनाती करण्याची मागणी केली आहे.

मागच्या १५ दिवसात शिवाजी नगरमध्ये करोना व्हायरसचे १ हजार रुग्ण आढळले आहेत. तरीही तिथे अजूनही मोठया प्रमाणावर गर्दी असते.

“महाराष्ट्र सरकारने केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० तुकडया मागवल्या आहेत. या तुकडयांचा ते का वापर करत नाहीयत?” असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. ‘शिवाजी नगरसारख्या भागांमध्ये या तुकडयांची तात्काळ तैनाती करा’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

आणखी वाचा- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा…; प्रविण दरेकर यांचा इशारा

महाराष्ट्र सध्या एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या २९१०० आहे. एकूण ६५६४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात अजूनही २१४६७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.