मुंबईकरांसाठी २९ सप्टेंबर हा दिवस सुरु झाला तो नेहमीसारखाच धावपळीचा आणि गर्दीचा. परळ-एल्फिन्स्टन पुलावर काय वाढून ठेवले आहे हे रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठे ठाऊक होते? सकाळी १०.३० ते ११ च्या सुमारास परळ स्टेशनवर लोकल थांबली, पाऊस सुरु झाला. पाठोपाठ दुसरी लोकलही थांबली. त्यामुळे परळ-एल्फिन्स्टन पुलाच्या पायऱ्यांवर प्रवाशांची एकच गर्दी झाली. काय होते आहे हे समजायच्या आत प्लॅटफॉर्म आणि पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले. यानंतर सुरु झाली ती जीव वाचवण्याची धडपड. काही लोकांचा श्वास गुदमरू लागला. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, एक दोन माणसे पडली आणि 'पूल पडला' असे काही लोक ओरडले, ज्यामुळे हलकल्लोळ उडाला. जीव मुठीत घेऊन लोक धावू लागले. चेंगराचेंगरीत २२ मुंबईकरांचा मृत्यू झाला. तर ३३ लोक जखमी झाले. आज झालेल्या धक्कादायक घटनेने बरोबर महिन्याभरापूर्वीच्या अर्थात २९ ऑगस्टच्याही आठवणी ताज्या केल्या. याच दिवशी मुंबईत प्रचंड पाऊस सुरु झाला. मुसळधार पावसाने त्यादिवशी विविध घटनांमध्ये १० मुंबईकरांचा जीव घेतला. २९ ऑगस्टच्या सकाळी १० च्या सुमारास घरातून निघालेले लोक ट्रेनमध्ये सहा ते सात तासांपेक्षा जास्तवेळ अडकले. ट्रॅकवर पाणी साठू लागले, सायन-कुर्ला-माटुंगा-दादर या स्टेशन्स दरम्यान पाणी साठले. अनेकांना ऑफिस गाठण्यासाठी दुपारचे ४ वाजले. अनेकांनी घरी चालत जाण्याचा पर्याय निवडला. मग मुंबईची लाईफलाईन अर्थात ट्रेन बंद झाली. अनेक मुंबईकरांनी ऑफिसमध्येच थांबण्याचा पर्याय निवडला. ३० ऑगस्टच्या सकाळनंतर अनेक मुंबईकरांना घर गाठणे शक्य झाले. या दोन घटनांवर लक्ष केंद्रित केले तर २९ तारीख ही मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरली का काय, असाच प्रश्न निर्माण होऊ लागला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये २९ तारखेलाच मुंबईत दुर्घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावणे ही बाब दरवर्षीचीच झाली आहे. महापालिकेकडून स्वच्छतेचे, साफसफाईचे दावे केले जातात. पण मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साठतेच. याला जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कारण राज्य सरकार मुंबई महापालिकेवर याची जबाबदारी ढकलते आणि मुंबई महापालिका सरकारवर. अशात मुंबईकरांची सुरक्षा रामभरोसे आहे. शुक्रवारी म्हणजेच २९ सप्टेंबरलाही मुंबईकरांवर काळाने घाला घातला. अरूंद पूल हे २२ लोकांच्या मृत्यूचे कारण असू शकते का? निश्चितच नाही. तरीही मुंबईतील परळ-एल्फिन्स्टनच्या अरूंद पुलाने २२ जणांचा बळी घेतला आहे. आता केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या राजीनाम्याचीही मागणी होते आहे. राजीनाम्यांची मागणी होईल. मुंबईकर संतापतील. काँग्रेस-राष्ट्रवादीने तर मेट्रो नको आधी रेल्वेची अवस्था सुधारा अशी मागणी करत राजकारण सुरु केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, गंभीर जखमींना १ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजारांची मदतही जाहीर झाली आहे. अशा सगळ्या वातावरणात मुंबईकर उद्या पुन्हा बाहेर पडेल, धावत ट्रेन पकडेल. 'विंडो सीट' मिळवण्याचा प्रयत्न करेल. उशीर झाला तरीही फास्ट लोकलची वाट बघत बसेल. 'worst class' असे एकच नाव देऊ वाटणाऱ्या फर्स्ट आणि सेकंड क्लासच्या डब्यातून प्रवास करेल आणि या सगळ्याला मुंबईकरांचे स्पिरीट असे नाव दिले जाईल. मात्र तो त्याचा नाईलाज आहे हे नवी दुर्घटना घडल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही हे जळजळीत वास्तव नाकारता येणार नाही.