साहित्य संमेलनाध्यक्षांचे नाव पहिल्यांदाच ऐकल्याची प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या मुद्दय़ाला हात घालत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वातावरणावर मत मांडणाऱ्या ‘उडदामाजी काळे गोरे’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा पुण्यातील ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चा विद्यार्थी अक्षय जोशी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत नवी मुंबईतील ‘दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी वैभव मुंढे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘उडदामाजी काळे गोरे’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या अक्षय आणि वैभव यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. अक्षय यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर वैभव यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यातील राम बारसे, विशाल मर्ढेकर, आदित्य पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत उत्तम लेखन केले. राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.