अंमलबजावणीला मुहूर्त मात्र सापडेना; मुंबईच्या अनेक भागात नियोजनाअभावी दुर्भिक्ष
तहान भागविण्यासाठी मुंबईकरांना ‘समान पाणीवाटप’ करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. परंतु, आजही मुंबईत अनेक भागांत अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी त्रस्त असून डोंगराळ भागांत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही ‘समान पाणीवाटपा’च्या अंमलबजावणीसाठी पालिका अधिकाऱ्यांना मुहूर्तच सापडलेला नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसे पाणी असतानाही मुंबईतील अनेक भागांतील रहिवासी तहानलेलेच आहेत.
पाण्याचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र कमी दाबामुळे अनेक भागातील रहिवाशांना अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत, यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईमध्ये समान पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने पालिका अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. तसेच डोंगराळ भागांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावले होते.
आयुक्तांनी आदेश देऊनही अद्याप मुंबईकरांना ‘समान पाणीवाटप’ करण्याच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत.

डोंगराळ भागात पाणीटंचाईच्या झळा
मुंबईत अनेक ठिकाणच्या डोंगरांवर झोपडय़ा बांधून रहिवासी वास्तव्य करीत आहेत. डोंगरांवरच्या बहुतांश वस्त्या राजकीय पक्षांच्या मतपेढय़ा बनल्या आहेत. पाणी कपात लागू केल्यानंतर या वस्त्यांचा पाणीपुरवठा आटला आहे. त्यामुळे पाण्याचा दाब वाढवावा अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. पाण्याच्या टाक्यांमधील पातळी पुरेशी राखून डोंगरावरील वस्त्यांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, असे आदेश अजय मेहता यांनी दिले. पण आजही डोंगरावरच्या या वस्त्यांची तहान भागेल इतके पाणी तेथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.