मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शिवसेनेला शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवाअसं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले होते. शिवसेनेच्या नव्या अभियानावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ‘तुम्ही घराघरात जाच’, असं म्हणत आव्हान दिलं आहे. शेलार यांनी शिवसेनेला सवालही विचारले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिव संपर्क अभियान राबवण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसेना घराघरात पोहोचवावी, असंही ठाकरे बैठकीत म्हणाले. शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

आणखी वाचा- शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

“घराघरात जाताय?जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे… कोरोनाला घाबरून “घराघरात” लपून का बसला होतात?, मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात?, एकही रुपयांची मदत का दिली नाहीत?, अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय?, बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत?, समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय?, आता उपनगरात एनए टँक्स वसूली करुन पाकिटमारी का करताय?, असे बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत… त्यामुळे जाच तुम्ही घराघरात!,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- … तर पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेऊ; मुंबईकरांना महापालिकेचा इशारा

बैठकीत काय झालं?

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा, विधानसभा आणि जिल्हानिहाय पक्षबांधणीचा आढावा घेतला. नवीन मतदार नोंदणी अभिनाय, शिवसेना सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्यात यावे. त्याचप्रमाणे गावागावातील प्रकल्पाची माहिती घेण्याची सूचना ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मतदारांची मतं, सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत का, यासंबधी अहवाल तयार करून सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.