मुंबई :  शिवडी परिसरातील गाडी अड्डा येथे काही दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची गळती शोधून दुरुस्त करण्यात पालिकेच्या जलअभियंता विभागाला यश आले आहे. जलअभियंता व जलकामे विभागाच्या पथकाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केवळ अडीच तासात पूर्ण केले. विशेष म्हणजे कोणत्याही भागाचा पाणीपुरवठा बंद न करता हे काम करण्यात आले आहे.

मुंबईतील विविध परिसरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भंडारवाडा जलाशय, गोलंजी हिल जलाशय व फॉसबेरी जलाशय; या तीन जलाशयांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील ‘टनेल शाफ्ट’मध्ये ही गळती होत होती. त्यामुळे कोटय़वधी लिटर पाणी वाया जाऊन पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, सकाळी ७ ते ९:३० या केवळ अडीच तासांच्या कालावधीत पाण्याचा दाब कमी असताना दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. दुरुस्ती वेळी प्रति मिनिट २ हजार ९०० लिटर पाणी उपसा करण्याची क्षमता असणारे पंप वापरण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी)  अजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक अभियंता (जलकामे) (तातडीचा दुरुस्ती विभाग)  जीवन पाटील आणि त्यांच्या सहकारी पथकाने हे काम यशस्वीरीत्या पार पाडले.

भविष्यात वाया जाणारे कोटय़वधी लिटर पाणी या दुरुस्तीमुळे वाचविण्यात महानगरपालिकेच्या पथकाला यश आले आहे. सोबतच, एफ/दक्षिण विभागातील विविध भागांचा तसेच भंडारवाडा हिल जलाशयाची पातळी वाढल्याने ‘इ’ व ‘बी’ विभागातील पाणीपुरवठा उच्च दाबाने व सुरळीत होणार आहे.