सहा दिवसांनंतरही बदलीबाबत हालचाल नाही पीएचडी करणारे सफाई कर्मचारी सुनील यादव यांना कार्यमुक्त न करता बदली दिल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने अद्यापही बदलीचे कोणतेही कागदपत्र न दिल्याने यादव यांना या विभागातून त्या विभागात पायपीट करण्याची वेळ आली आहे. सुनील पीएचडीच्या अभ्यासासाठी येत्या ११ ऑगस्टपासून ३१ डिसेंबपर्यंत सुट्टीवर जाणार आहेत. परंतु त्या आधीच पालिकेने त्यांना कार्यमुक्त केल्याने आता या सुट्टीच्या काळातील वेतन मिळणार का, याबाबत साशंकता असल्याने या काळात चार जणांचे कुटुंब कसे चालवायचे, अशी चिंता सुनील यांना लागली आहे. महानगरपालिकेमध्ये घनकचरा विभागात कचरा उचलण्याचे काम करणारे सुनील यादव हे मागील १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. ते टाटा सामाजिक विज्ञान या नामांकित संस्थेमधून पीएचडी करत आहेत. पालिकेने २ जुलै रोजी त्यांना कार्यमुक्त केल्याचे पत्र देऊन उद्यापासून डी वार्डमधील कार्यालयात कामासाठी येऊ नये, असे सांगितले. याबाबत त्यांनी पालिकेकडे खुलासा मागितला असता त्यांना केवळ ‘डी विभागाच्या कामातून मुक्त केले आहे’ अशी सारवासारव पालिकेने केली. यादव यांनी केलेल्या अर्जानुसार त्यांची बदली ‘एम’ विभागात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेला आता पाच दिवस उलटले तरी अद्याप बदलीची कोणतीही कागदपत्रे किंवा बदलीची ऑर्डर काढण्यात आलेली नाही. ‘मी येत्या ११ ऑगस्टपासून सुट्टीवर जाणार आहे. तेव्हा या बदलीबाबतचा निर्णय लवकर होणे गरजेचे आहे. अन्यथा माझे वेतन खंडित होण्याची शक्यता आहे. आमच्या विभागाचे आयुक्त बालमवार यांनी तुझी बदली एम वॉर्डला केली आहे, असे सांगतात. याबाबत माझी व्यथा आमच्या खात्याचे पर्यवेक्षक पहाड यांच्यापुढे मी सोमवारी मांडली. त्यांनी मला पुन्हा डी वार्डमध्ये रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत खंडित होणारे वेतन देण्यात यावे, असेही विभागाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. परंतु हे आश्वासन तोंडी असल्याने याबाबत कोणता ठोस निर्णय केव्हा होईल हे मात्र अनिश्चितच आहे. त्यामुळे माझी दोन्ही बाजूंनी पालिकेने कोंडी केली आहे,’ असे सफाई कर्मचारी सुनील यादव यांनी सांगितले.