वॉर्डस्तरावर पालिकेचा प्रयोग; एकाच यंत्रणेकडून कचरा गोळा करणार ‘स्वच्छ भारत अभियाना’त शाबासकीची थाप मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीचा कित्ता आता मुंबई महापालिका गिरवणार आहे. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासोबतच यासाठी एकाच यंत्रणेकडून हे काम करून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. परंतु मुंबईतून निर्माण होणारा कचरा नवी मुंबईच्या तुलनेत १२ पटीने अधिक असल्याने या प्रकल्पाची सुरुवात ‘आर’ आणि ‘टी’ या वॉर्डातून करण्यात येणार आहे. त्यानंतर वर्षभरात संपूर्ण शहरात एकात्मिक प्रणालीने कचरा व्यवस्थापन केले जाईल. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईतील कचरा व्यवस्थापन प्रणालीची प्रशंसा करण्यात आली. यातील रंजक बाब अशी की नवी मुंबईत ही यंत्रणा राबवण्याआधी राज्य सरकारकडून मुंबई पालिकेला ही यंत्रणा योग्य असल्याचा निर्वाळा देण्याबाबत सांगण्यात आले होते. ‘या प्रणालीत कचऱ्याचे वर्गीकरण, वाहतूक व व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत आहे. ही संपूर्ण व्यवस्था तिथे एकाच यंत्रणेकडून राबवली जात असल्याने या कामात एकवाक्यता आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कचरा जमा करणे व वाहतुकीच्या प्रकारात सुधारणा करण्यासाठी मुंबईतही कचरा व्यवस्थापनात एकात्मिक प्रणाली आणण्याचा विचार होत आहे,’ असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले. नवी मुंबईत दिवसाला सुमारे ७०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो, तर पालिकेत तब्बल ८६०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यामुळे नवी मुंबईची प्रणाली संपूर्ण शहरासाठी एकत्रितपणे राबवता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डनुसार टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा राबवली जाईल. पालिकेच्या २४ वॉर्डसाठी कचरा वाहतुकीसाठी वेगवेगळ्या निविदांद्वारे कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कंत्राट कालावधी वर्षभरात संपणार असून याजागी एकात्मिक यंत्रणेद्वारे कचरा व्यवस्थापनाचा विचार पालिका करत आहे. याची सुरुवात आर उत्तर (दहिसर), आर मध्य (बोरिवली), आर दक्षिण (कांदिवली) व टी (मुलुंड) या वॉर्डपासून केली जाणार आहे. या महिन्यात या प्रस्तावाला आयुक्तांकडून मान्यता मिळाली की पुढील महिन्यात तो प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडला जाईल. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर निविदा काढल्या जातील. आर वॉर्डच्या कचरा वाहतुकीचा कंत्राट कालावधी ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. नवी मुंबईचे कचरा व्यवस्थापन नवी मुंबईत गृहनिर्माण संस्थांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी आरएफआयडी (रेडियो फ्रीक्वन्सी आयडेंटिफिकेशन) रीडर लावलेल्या कचरापेटी कंत्राटदारांकडून पुरवल्या जातात. कचरा वेगळा गोळा करणे, तो कचरागाडय़ांमध्ये भरणे, गाडय़ांना जीपीएस यंत्रणा लावणे आणि कचऱ्याची वाहतूक करण्याची जबाबदारीही एकाच कंत्राटदाराकडे आहे. त्यामुळे कचरागाडय़ा कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी कचरा गोळा केला गेला हे पालिकेच्या अधिकाऱ्याला पॅनलवरील एका दृष्टिक्षेपात समजते. नवी मुंबईत दर दिवशी ओला कचरा गोळा केला जातो, तर आठवडय़ातून दोन वेळा सुका कचरा गोळा केला जातो. मुंबईची सध्याची कचरा प्रणाली पालिकेने गृहनिर्माण संस्थांना वेगवेगळ्या कचरापेटींमध्ये ओला व सुका कचरा ठेवण्याचे आवाहन केले आहे. कचरा वाहतुकीसाठी वॉर्डनुसार कंत्राटदार नेमले गेलेले आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कंत्राटावर नेमले गेलेले कर्मचारी कचरा उचलून गाडय़ांमध्ये भरतात. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठीही पालिकेने ३४ ठिकाणी व्यवस्था केली आहे. तेथे विविध सामाजिक संस्थांकडून कचरा वर्गीकरणाचे काम केले जाते. १००० मे. टन ‘आर’ वॉर्डमधून दररोज गोळा होणारा कचरा(दहिसर, बोरिवली व कांदिवली उपनगरे) २०० मे. टन ‘टी’ वॉर्डातून दररोज गोळा होणारा कचरा (मुलुंड परिसर)