किनारा मार्गाच्या कामासाठी पालिकेला परवानगी नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारण्यात येत असलेल्या किनारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी वरळी, हाजीअली आणि मरिन ड्राइव्ह येथील किनाऱ्यालगत टाकण्यात आलेले टेट्रापॉड हलविण्यास राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील किनारा विभागाकडून हिरवा कंदील दाखविला आहे. मुंबईतील वाहतुकीला गती देण्यासाठी नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान किनारी मार्ग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. किनारी मार्गाच्या कामासाठी मरिन ड्राइव्ह, हाजी अली आणि वरळी किनाऱ्यालगत टाकण्यात आलेले ‘टेट्रापॉड’ हलविण्यास करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. या विभागाने १६ सप्टेंबर रोजी पालिकेला पत्र पाठवून ‘टेट्रापॉड’ हलविण्यास हरकत नसल्याचे कळविले आहे. मात्र ‘टेट्रापॉड’ हलविताना कोणतीही हानी झाल्यास त्याची जबाबदारी पालिकेची असेल. तसेच ‘टेट्रापॉड’ हलविण्याचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनीकडून करून घेणे आवश्यक आहे. हे काम किनारा अभियंत्यांच्या देखरेखीखाली करावे. तसेच हे काम तांत्रिक मार्गदर्शन आणि तज्त्रांच्या देखरेखीखाली करण्यासाठी येणारा खर्च पालिकेने उचलावा, असे या विभागाने परवानगी देताना स्पष्ट केले.