टँकरद्वारे बगीचे, मैदानांना पाणीपुरवठा मुंबईतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून निर्माण करण्यात येणारे ‘महाग’ पाणी कोणीही खरेदी करत नाही, या सबबीखाली हे पाणी समुद्रात सोडून देणाऱ्या मुंबई महापालिकेला अखेर या पाण्याचा सदुपयोग करण्याचे महत्त्व पटले आहे. या पाण्याचा खर्च वसूल करण्याच्या पालिकेच्या अट्टहासामुळे शहरातील बगीचे आणि उद्यानांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध होताच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी याची दखल घेतली. प्रक्रियाकृत पाण्याचे टँकरद्वारे वितरण करण्यासाठी भरणाकेंद्रे उभारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टळणार आहे. कुलाबा, बाणगंगा आणि माहीम येथे महानगरपालिकेच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रांमध्ये दररोज साडेपाच दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते बागांमध्ये वापरण्यायोग्य केले जाते. मात्र हे पाणी बागांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलवाहिन्या नसल्याने तसेच टँकरमधून पाणी नेण्यासाठीही भरणा केंद्र नसल्याने हे पाणी बागांपर्यंत नेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तसेच प्रक्रियाकृत पाण्यावर केला जाणारा हजार लिटर मागील पाच रुपयांचा खर्च वसूल करण्याच्या अट्टहासापायी महापालिका प्रशासन पिण्यायोग्य पाण्याच्या वितरणात होणारा साडेसात रुपये प्रति हजार लिटरचा तोटा सोसते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने दि. २० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची पालिका आयुक्त अजय मेहता यांनी तातडीने दखल घेतली. ‘सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाणी पोहोचवण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी आवश्यक आहे. पण ही दीर्घकालीन योजना आहे. सध्या टँकरने पाणी पुरवता यावे यासाठी आम्ही तीनही ठिकाणी भरणा केंद्र उभे करणार आहोत,’ असे आयुक्त अजय मेहता म्हणाले. दरम्यान, टँकरद्वारे पाणी नेणे हा तात्पुरता उपाय आहे, मात्र जलवाहिनी नसल्यास पाणीपुरवठा करणे पुढील काळात व्यवहार्य ठरणार नाही. शिवाय बागांना साडेतीन रुपये प्रति हजार लिटर या दराने पिण्याचे पाणी सहजी उपलब्ध होत असताना ते टँकरद्वारे अधिक खर्च करून सांडपाणी का विकत घेतील, याबाबत शंका असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ण बंद केल्याशिवाय बागांचे व्यवस्थापक थोडे खर्चीक सांडपाणी घेणार नाहीत, त्यामुळे पालिकेने याबाबतही लक्ष घातले पाहिजे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.