मुंबईकरांसाठी खूशखबर असून पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पाणीकपात रद्द केली जावी यासाठी पालिकेवर राजकीय दबाव टाकला वाढू लागला होता. तसंच पाणीनगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात रद्द केली जावी अशी मागणी केली होती. मुंबई शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठ्यामध्ये आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीपासून शहरात उपनगरामध्ये केलेली 10 टक्के पाणी कपात तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली होती.

मुंबई शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षी पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये 10 टक्के कपात केली होती. तसेच पाणी पुरवठ्याच्या वेळेतही 15 टक्के कपात केली.

यंदा जून व जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे तलावातील उपयुक्त जलसाठा साधारणपणे 50 टक्केपर्यंत झाला आहे. अद्याप सप्टेंबरपर्यंत सुमारे 57 दिवस पावसाचे आहेत. या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल. गेल्या वर्षी पाणी टंचाईमुळे महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली होती. मुंबईतील विशेषतः उपनगरातील नागरिकांना या कपातीचा त्रास होत होता. यंदाच्या पुरेशा साठ्यामुळे महानगरपालिकेने केलेली ही कपात तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा आणि उपनगरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही योगेश सागर यांनी यावेळी केली होती.