पावसाने दांडी मारल्याने मुंबईकरांना जुलैअखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठय़ातून सध्या मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईवासियांना जुलैअखेर सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल असं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई आणि तलाव क्षेत्रात अद्यापही गरजेइतका पाऊस पडलेला नाही. यामुळे तलावात पाणीसाठा जमा होत नाही आहे. महापालिकेने जरी जुलैअखेर पाणी पुरवण्याचे नियोजन केले असले तरी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, तसेच साठवलेलं पाणी टाकून न देता त्याचा इतर गोष्टींसाठी वापर करावा असं आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई, ठाण्यावर पाणीसंकट ; जलाशयांत अवघे २० दिवस पुरेल इतकाच साठा

‘चेन्नईत भीषण पाणीटंचाई, पाणी सोन्यापेक्षाही महाग’

मुंबई आणि ठाण्यात आगामी दिवसांत पाणीसंकट अधिकच तीव्र होण्याची भीती आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक पाणीबाणीने चिंतित आहेत. मुंबईकरांना दररोज उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामधून ३,६५० दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरण संकुलात आणले जाते. शुद्धीकरणानंतर मुंबईकरांना ३,५१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी १३५ दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. या सातही तलावांमध्ये २६ जून रोजी सकाळी ६ वाजता सुमारे ७३ हजार ७८४ दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २ लाख ५३ हजार ०४३ दशलक्ष लिटर पाणी तलावात होते.

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे पालिकेच्या जल विभागातील अधिकारी चिंतीत झाले आहेत. दरवर्षी साधारण ७ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होतो. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात होते आणि हळूहळू जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईकरांची तहान भागविणारे तलाव एकामागोमाग एक भरून ओसंडून वाहू लागतात. मात्र यंदा जूनमध्ये तुरळक सरी कोसळल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.