हाजी अली दग्र्यातील महिलांवरील प्रवेश बंदी
हाजी अली दग्र्यातील ‘मझार’च्या परिसरात महिलांच्या प्रवेशास घालण्यात आलेली बंदी कायम राहणार की उठवली जाणार याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय २८ जून रोजी देणार आहे.
हाजी अली दग्र्यातील ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश म्हणजे इस्लाम धर्मानुसार पाप आहे. त्यामुळे तेथे महिलांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात डॉ. नूरजहाँ मिर्झा यांनी अ‍ॅड्. राजू मोरे यांच्यामार्फत याचिका केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. त्या वेळेस शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणाची स्थिती काय आहे, याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. शिवाय शनिशिंगणापूर मंदिरातील महिला प्रवेशाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रतही न्यायालयाने सादर करण्यास सांगितली आहे. तसेच निर्णय २८ जून रोजी देण्यात येईल, असेही स्पष्ट केले. हाजी अली दर्गा ‘मझार’ परिसरात महिलांना घालण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा मुद्दा न्यायालयाबाहेर सामोपचाराने सोडवा, असा सल्ला याचिकाकर्ते आणि दर्गा ट्रस्ट यांना न्यायालयाने यापूर्वी वेळोवेळी दिला होता.