माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाने २६ ऑक्टोबरपर्यंतचा दिलासा दिला आहे. गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिली. त्यामुळे याच प्रकरणात गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांच्यावरही २६ ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचारामागे माओवाद्यांचा हात आहे, माओवाद्यांशी संबंध असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध आहे अशा आरोपाखाली पुणे पोलिसांनी काहींना अटक केली होती. गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी आहेत. माओवाद्यांशी वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध आहे, अशा आरोपाखाली पुणे पोलिसांनी काहींना अटक केली, त्यात नवलखा यांचाही समावेश होता. त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह त्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र या विरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वीच दिले. त्यानंतर नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पुणे पोलिसांकडे माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं म्हटलं आहे.