मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की त्याला तुरुंगात जावे लागणार हे पुढील काही वेळात स्पष्ट होईल. उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सध्या सुरू आहे.
सदोष मनुष्यवधाचा आरोप चुकीचा असल्याचा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी न्यायालयात केला. कोणालाही मारण्याचा सलमान खानचा हेतू नव्हता, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये कमाल खानही होता. त्याची साक्ष पोलीसांनी का नोंदविली नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला. या खटल्यामध्ये सर्व साक्षीदारांची साक्षच नोंदविण्यात आलेली नाही, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या खटल्यातील साक्षीदार रविंद्र पाटीलच्या म्हणण्यानुसार सलमान खान वेगाने गाडी चालवत होता, तर मग हॉटेल मॅरिएट ते अपघातस्थळी पोहोचण्यासाठी लॅंडक्रुझरसारख्या गाडीला ३० मिनिटे कशी काय लागली, त्याचबरोबर गाडीचे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा मुद्दाही निकाल देण्यापू्र्वी विचारात घेण्यात आला नाही, असाही युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.
अमित देसाई सलमान खानच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करीत आहेत तर संदीप शिंदे सरकारची बाजू मांडत आहेत. सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतर लगेचच उच्च न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता.
२८ सप्टेंबर २००२ रोजी घडलेल्या या घटनेमध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून सलमान खानने मुंबईतील अमेरिकन बेकरीनजीकच्या पदपथावर झोपलेल्या चारजणांना आपल्या गाडीने चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर अन्यांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले. या प्रकरणी गेल्या १३ वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. गेल्याच आठवडय़ात सर्व युक्तिवाद संपुष्टात आल्यानंतर बुधवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला होता.
सलमानने जबाब नोंदवताना अपघात आपल्या हातून नव्हे, तर चालक अशोक सिंग याच्या हातून घडल्याचा दावा केला होता. सलमानचा हा दावा न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. सलमानने गुन्हा केला नव्हता तर अपघात घडला त्या वेळेस त्याने घटनास्थळी जमलेल्या जमावाला चालकाविरुद्ध कारवाई करू, असे आश्वासित का केले नाही, त्याने पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची तक्रार का नोंदवली नाही, असे मुद्दे न्यायालयाने उपस्थित केले आहेत. एवढेच नव्हे, तर सलमानने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतल्याचे वा त्यांना वैद्यकीय मदत केल्याचे आणि पुन्हा पोलिसांसोबत घटनास्थळी आल्याचा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.