जातपंचायतांनी वाळीत टाकल्याने मंत्रालयाबाहेर गणेशमूर्तीसह ठाण मांडून बसलेले कुडाळ तालुक्यातील हेवाळेकर दाम्पत्याच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानातील गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हेवाळेकर दाम्पत्यांची विचारपूस केली.
हेवाळेकर दाम्पत्यांनी बुधवारी रात्री गणेशमुर्तीसह मंत्रालयाबाहेरच ठाण मांडले होते. मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार करुनही दोषींवर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ या दाम्पत्याने मंत्रालयाबाहेर ठाण मांडले होते.
अधिक माहिती अशी, कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावात परमानंद आणि प्रीतम हेवाळेकर हे दाम्पत्य राहतात. या दाम्पत्याने गावातील रुढी परंपरांना विरोध दर्शवला होता. यानंतर जातपंचांनी हेवाळेकर कुटुंबाला बहिष्कृत केले. २००६ पासून हेवाळकेर कुटुंबीयांना ग्रामस्थांनी वाळीत टाकले आहे. सरपंच पंढरीनाथ परब यांच्याविरोधात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे हेवाळेकर दाम्पत्याने तक्रार केली होती. मात्र त्यानंतरी सरपंचावर कारवाई झालीच नाही. शेवटी या दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण अजूनही पंढरीनाथ परब यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
गेल्या तीन वर्षांपासून हेवाळेकर दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येत आहे. यंदादेखील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हेवाळेकर गावात दाखल झाले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना गावात प्रवेश करु दिला नाही. सरकारकडून मिळणा-या अनुदानाचे पैसे गावात वाटावे लागतात. याला विरोध केल्याने आमच्या शेतीची नासधूस करण्यात आली आणि आम्हाला वाळीत टाकण्यात आले असा आरोप परमानंद हेवाळेकर यांनी केला आहे.