मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मोदीमुक्त भारत' हा नारा दिला. ज्याचे पडसाद सोमवारच्या सकाळीच बघायला मिळाले. अनेक मनसैनिकांनी मुंबई-अहमदाबाद मार्ग, तसेच वसई, विरार भागातल्या गुजराती पाट्या हटवल्या. याच प्रकरणी ६ मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेने खळ्ळ खटॅक पद्धतीने आंदोलन करत गुजराती पाट्यांना लक्ष्य केले त्याचमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वालीव पोलीस ठाण्यात सहा मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case registered against at least 6 MNS workers in Vaaliv Police Station for vandalising Gujarati signboards at shops in Vasai yesterday. #Maharashtra — ANI (@ANI) March 19, 2018 राज ठाकरे यांनी मोदींवर हल्ला करताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवले जात असल्याचा आरोप केला. वसई-विरारमध्ये गुजराती लोकांची संख्या वाढतेय. हा मोदी-शहा जोडगळीचा डाव असल्याचे ते म्हणाले. बीकेसीतील नोकऱ्या मोदींनी गुजरातला पळवल्या. मी गुजरात दौऱ्यावर असताना मोदींनी माझ्यासमोर चांगले चित्र उभे केले. मात्र, ते खोटे होते. मोदींचा खरा चेहरा आता दिसला असून त्यांनी गुजरातची वाट लावली आहे, असा आरोप करत आजही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अनेक दुकान आणि हॉटेलवर मराठी ऐवजी गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता. या उल्लेखानंतरच गुजराती पाट्यांविरोधात मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत खळ्ळं खटॅक आंदोलन केले. याच प्रकरणी मनसेच्या ६ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.