देशातील १३ राज्यांना १४ हजार किलोमीटरचा लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर २८० दीपगृह आणि १३०० लहान मोठी बेटे देखील आहेत. मात्र ही दीपगृह आणि बेटे आजवर दुर्लक्षित राहिली आहेत. यातील ७० बेटे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते अलिबाग जवळील कान्होजी आंग्रे बेटावर बांधण्यात येणाऱ्या प्रवासी जेटीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. गेटवेपासून ९ नॉटिकल मैल अंतरावरील कान्होजी आंग्रे बेटावर उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आमदार जयंत पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे नौकानयन मंत्रालयाच्या माध्यमातून मोठे व्यापारी बंदर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कामाची सुरूवात केली जाणार आहे. देशातील सर्व लहान मोठी बंदरे रस्त्यांनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्पांसाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी राज्य सरकारला केली. फेब्रुवारीपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. २०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष असून या निमित्ताने मुंबईलगतच्या समुद्रातील बेटांवर पर्यटन विकास कसा करता येईल तसेच याठिकाणी सुरक्षेचा चोख बंदोबस्तही करण्याच्या अनुषंगाने विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याचे नवे बंदर विकास धोरण तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. येत्या १५ दिवसांत ते मंत्रिमंडळासमोर मांडले जाणार आहे. व्यापार उद्योग, पर्यटन आणि जल प्रवासी वाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न असणार आहे. कोकण किनारपट्टीवरील बेट आणि लँण्डीग सेंटर्स सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे बेट विकसित करणे त्याठिकाणी लोकांची वर्दळ वाढवणे, सीसीटीव्हीसारख्या सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे गरजेच आहे. यासाठी पाऊले उचलली जातील, असेही ते म्हणाले.