केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा व सुशीलचंद्र मंगळवारी मुंबईत येत आहेत. आयोगाच्या वतीने मंगळवारी व बुधवारी सलग दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या असून, त्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतोय, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. निवडणूक आचारसंहिता कधीही लागेल, म्हणून मंत्रालयातही अधिकारी-कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. मंत्रालयात कामे घेऊन येणाऱ्यांची वर्दळही नेहमीपेक्षा वाढलेली आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त व अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन दोन दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततेच्या वातावरणात कशी पार पाडली जाईल, याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.