उन्हाळ्यामध्ये मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन यंदाही मध्य रेल्वेने आतापर्यंत ६३० जादा फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे. या जादा फेऱ्यांमध्ये सर्वाधिक फेऱ्या गोरखपूरसाठी असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते सिकंदराबाद दरम्यान वातानुकूलित गाडीच्या २६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची विशेष काळजी घेणाऱ्या मध्य रेल्वेने दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र अद्याप फारशा विशेष फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत.
आतापर्यंत मध्य रेल्वेने ६३० विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. उन्हाळ्यात मुंबईतून कोकणात, तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांइतकीच असते. तरीही कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी १०६ फेऱ्याच असून कोकणासाठीही केवळ ७८ फेऱ्या आहेत.