अप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवर दादर-माटुंगा दरम्यान केलेले ठिय्या आंदोलन अखेर साडेतीन तासांनंतर मागे घेण्यात आले. रेल्वे भरतीच्या संदर्भातील अनेक मागण्या प्रलंबित असल्याने देशभरातील विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले घाईच्या वेळेला मुंबईकरांना वेठीस धरले. दरम्यान राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहे असे आश्वासन दिले. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आपण स्वत: या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रिय स्तरावर रेल्वे भरती संदर्भातील मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मनसेचे नेते ठराविक विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत जातील. त्याठिकाणी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन या विषयाचा तडा लावणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. तुमच्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करणार असे आश्वासनही राज यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘आम्ही तोडगा काढण्यासाठी इथे आलो आहोत मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी’, असेही त्यांनी सांगितले. ‘रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांवरुन चर्चा करण्याऐवजी इथे येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, असेही देशपांडे म्हणाले होते.

पूर्वीपासूनच रेल्वेमध्ये ट्रेड अप्रेटिंसपदाची भरती केली जाते. या युवकांना रेल्वेच्या मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिक विभागात तात्पुरती नियुक्ती दिली जाते. सेवा कालावधीत त्यांना प्रशिक्षित केले जाते. यासाठी त्यांना मानधनही दिले जाते. गेल्या अनेकवर्षांपासून रेल्वेत ही पद्धत आहे. पूर्वी अशा अप्रेटिंसना रेल्वेत सामावून घेण्याचे अधिकार सरव्यवस्थापकांना (जीएम) होते. त्यामुळे अनेकांना रेल्वेत काम करण्याची संधी मिळाली. वर्ष २०११ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात यात बदल करण्यात आला आणि अप्रेटिंसला रेल्वेत नोकरी देण्याचे जीएमचे अधिकार काढून घेण्यात आले. आंदोलक विद्यार्थ्यांनी हीच पद्धत पुन्हा सुरू करण्याची आग्रही भूमिका मांडली आहे.