तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोबाइल अ‍ॅप तिकीट सेवा अधिकाधिक विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी ‘क्रिस’मार्फत (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम) विकसित केलेली मोबाइल अ‍ॅप तिकीट सेवा सुरू केली. मात्र ही सेवा जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचू शकली नाही.

सध्या मध्य रेल्वेवर रोज सात हजार तर पश्चिम रेल्वेवर पाच हजार प्रवासी मोबाइल तिकिटाचा वापर करीत आहेत. ७५ लाख प्रवाशांच्या तुलनेत मोबाइल तिकीट सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य रेल्वेने ही सेवा विस्तारण्याचा निर्णय घेतला. यासाठी महाविद्यालय, खासगी आणि सरकारी कार्यालयांत जाऊन माहिती देण्यात येईल.

‘अ‍ॅप’वर सुरुवातीला मोबाइलवर तिकिटाची मागणी नोंदवावी लागते. नंतर स्थानकात असलेल्या एटीव्हीएम यंत्रावर त्याची छापील प्रत मिळवावी लागते. मात्र यात बराच वेळ जात असल्याने कागदविरहित तिकिटाचा पर्यायही प्रवाशांना देण्यात आला; मात्र या दोन्ही सेवांकरिता रेल्वेची जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. रेल्वे हद्दीत ३० मीटर अंतरापर्यंत जीपीएस यंत्रणा कार्यरत असते.

त्यातही अनेक अडथळे येत असल्याने तिकीट काढणे वेळखाऊ प्रक्रिया होती. परंतु आता रेल्वेने जीपीएसची व्याप्ती वाढविली आहे. त्यामुळे घरांतही जीपीएस नेटवर्क मिळाल्याने अ‍ॅपवरील तिकीट मिळविता येते.