मालगाडी बंद पडल्यामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कर्जतहून सीएसटीला जाणाऱ्या या मालगाडीत बदलापूर-अंबारनाथ या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या ट्रॅकवरील अन्य गाड्याही अडकून पडल्या आहेत. यामध्ये बदलापूरहून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि काही एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून इंजिनाच्या दुरूस्तीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबद्दल नेमकी माहिती देण्यात आलेली नाही.