मुंबई आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळ प्रसरण पावल्याने रुळाला तडे गेले आहेत. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणखी एक तास लागेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाढलेल्या तापमानामुळे अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान बेलवली फाटकाजवळ रूळ प्रसरण पावल्याने रुळाला तडे गेले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पुढील अर्धा ते एक तासात वाहतूक सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे स्टेशन मास्तर यांच्याकडून देण्यात आली आहे. याचा फटका अंबरनाथ- बदलापूर दिशेला येणाऱ्या लोकल गाड्या व लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे.