किरकोळ बाजारात अवतरलेल्या महागाईमुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने घाऊक बाजारात तुलनेने स्वस्त दरात विकली जाणारी भाजी घराघरांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी थेट गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजीविक्री केंद्रे सुरू करण्यासाठी साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. १५० पेक्षा अधिक घरे असलेल्या वसाहतीमधील एखाद्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेने स्वस्त भाजीविक्री केंद्र सुरू करण्याची तयारी दाखविल्यास त्यास घाऊक बाजारांमधून भाजीपुरवठा करण्यास सरकार तयार आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुधीर तुंगार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या स्वस्त भाजीविक्री केंद्रात एपीएमसी ठरवेल त्याप्रमाणे भाज्यांचे दरपत्रक ठेवले जाणार आहे. घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो ३० रुपयांना विकला जात असतानाही किरकोळ बाजारात तो ६० ते ८० रुपयांनी विकला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील ३० रुपयांचा टॉमेटो स्वस्त भाजीविक्री केंद्रांत किलोमागे ३५ रुपयांना मिळेल, असा दावाही तुंगार यांनी केला. घाऊक बाजारातील भाज्यांच्या दरांपेक्षा १० ते १५ टक्के एवढय़ा जादा दराने या केंद्रांमध्ये भाजी उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे स्वस्त भाजी केंद्रांमध्ये घाऊक दरांपेक्षा चार ते पाच रुपयांपेक्षा वाढीव दर असणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारपासून सरकारने निश्चित केलेली दहा केंद्र सुरू होतील, याशिवाय आठवडाभरात आणखी १०० केंद्र सुरू करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. मोठय़ा गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या क्रमांकावर संपर्क साधून अशी केंद्रे सुरू करता येऊ शकतील.