लवकरच निर्णयाचे पर्यावरणमंत्र्यांचे संकेत

प्लास्टिक बंदीनंतर पर्यावरण विभागाने आता रासायनिक खतांकडे मोर्चा वळवला आहे. लोकांच्या आरोग्यास सर्वाधिक हानीकारक ठरणाऱ्या आणि शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या वापरावर राज्यात लवकरच बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु असून, त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरणविषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन उपस्थित होते.

संपूर्ण जगाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही प्लास्टिकच्या परिणामांची जाणीव झाली असून, नागरिक स्वत:हून प्लास्टिक पिशव्यांचा त्याग करून कापडी पिशव्या वापरु लागले आहेत. प्लास्टिक बंदीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, आता पुढच्या टप्प्यात रासायनिक खतांवर बंदी घातली जाणार आहे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे अन्न धान्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे.म्हणूनच प्लास्टिक बंदीनंतर आता रासायनिक खते वापरण्यावरही बंदी आणण्याबाबत पर्यावरण विभाग विचार करीत आहे, असे कदम यांनी सांगितले.

  • शंभर टक्के प्लास्टिक बंदी करणाऱ्या महानगरपालिकेस २५ लाख, नगर परिषदेस १५ लाख तर सहा महसूल विभागांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीस १० लाख रुपयांचे पारितोषिक पर्यावरण दिनी देण्यात येईल, अशी घोषणा कदम यांनी यावेळी केली.