मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग हे रविवारी निवृत्त होत आहेत. मात्र चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी आल्याने त्यांनी शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून अखेरचे कामकाज पाहिले. पर्यावरणप्रेमी म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे दिल्ली येथील असलेले मुख्य न्यायमूर्ती नंद्रजोग हे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढतीवर बदली करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील हे गेल्या वर्षी ७ एप्रिलला निवृत्त झाल्यावर न्यायमूर्ती नंद्रजोग यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार सांभाळला. गेल्या दहा महिन्यांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली. त्यात प्रामुख्याने पर्यावरणाशी संबंधित जनहित याचिकांचा समावेश होता. नंद्रजोग यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी वैध ठरवली होती. याशिवाय आवश्यक त्या पर्यावरणीय परवानग्या न घेतल्याच्या कारणास्तव सागरी किनारा मार्ग प्रकल्पाला स्थगिती दिली होती. याशिवाय ठाण्यातील अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणारी खासगी रुग्णालये, नर्सिग होमना टाळे ठोकण्याचे आदेशही दिले होते.